दंगली रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांची नीती केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी लागू करावी

‘हेट स्पीच’चा आरोप हिंदूंवर, मग रामनवमीतील दंगलखोरांवर मौन का ? या विषयावर ‘विशेष संवाद’

ठाणे : छत्रपती संभाजीनगर येथील दंगल हे एक षडयंत्र आहे आणि ‘औरंगाबाद’ नावाला समर्थन करणार्‍यांची विचाराधारा याला उत्तरदायी आहे. औरंगजेबाचा ‘दारुल इस्लाम’ (इस्लामचे शासन) हा उद्देश सफल व्हावा, यासाठी ही धडपड आहे. हिंदूंचे एकत्रीकरण आणि हिंदूंमध्ये याविषयी सामाजिक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. सध्या चालू असलेल्या दंगली रोखण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नीती केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी लागू करावी, असे प्रतिपादन संभाजीनगर येथील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष समीर लोखंडे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हेट स्पीच’चा आरोप हिंदूंवर, मग रामनवमीतील दंगलखोरांवर मौन का ?’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते.
‘सुदर्शन न्यूज’चे संभाजीनगरचे प्रतिनिधी बाबूलाल राठौर म्हणाले की, महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथील झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. दंगल करणार्‍यांकडे मोठ्या प्रमाणावर दगड आणि पेट्रोल बाँब होते. पोलिसांसमोर पोलिसांची वाहने जाळूनही पोलिसांनी दंगलखोरांवर साधा लाठीचार्जसुद्धा केला नाही. दंगलीचे पुरावे पोलिसांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दंगलीत जाळलेली वाहने पंचनामा न करता तेथून हलवली, रस्ते धुवून काढले. एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना दंगलीची माहिती पोलिसांच्याही आधी कशी मिळाली ? दंगलीच्या नियोजनामध्ये इम्तियाज जलील याचा हात आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. दंगलीनंतर पोलिसांनी पत्रकारांना जळालेल्या वाहनांची फोटो आणि व्हीडीओ काढायला का दिले नाहीत ? सत्य का लपवण्याचा प्रयत्न झाला ? हे प्रश्न गंभीर आहेत.
हावडा, पश्चिम बंगाल येथील ‘भारतीय साधक समाजा’चे अनिर्बान नियोगी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेथील दंगलींना अनुसरून हिंदूविरोधी विधानांमुळे विशेष करून हिंदु समाजाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री या नात्याने विधाने करतांना ते विचारपूर्वक करणे अपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानांमुळे दंगलखोरांवर कारवाई करण्यास पोलीस दलही घाबरत होते. पश्चिम बंगालमधील दंगलींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाच्या (एन्.आय.ए.च्या) माध्यमातून चौकशी होणे आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर म्हणाले की, रामनवमीला झालेल्या दंगलींवरून दंगलखोर हे दंगली करण्यासाठी प्रशिक्षित असल्याचे लक्षात येते. आपले वर्चस्व अबाधित ठेवणे, आपण कसे आक्रमक आहेत हे दर्शवणे, हिंदू समाज सदोदित भीतीच्या सावटाखाली जगावा, यासाठी धर्मांधांचा हा प्रयत्न आहे. देशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंनी हनुमानाप्रमाणे बलोपासना करणे, ही काळाची गरज आहे. संविधानाने प्रत्येकाला आत्मरक्षण करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याचा उपयोग करावा.

 62,301 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.